स्वातंत्र्योत्तर काळात कोल्हापुरात व.म.जेरेशास्त्री,बंडोपंत धर्माधिकारी,डॉ. नागावकर,आराध्ये वैद्य,जोशीराव,राजाज्ञा,उमराणीकर वैद्य यासारखी नामांकित मंडळी विविध क्षेत्रात कार्यरत होती तरी सामाजिक कार्यात हि मंडळी दुर्र्लक्षिली जात होती. यांच्या प्रयत्नातून ब्राह्मण सभा करवीर ची स्थापना झाली.
गांधी वधानंतर येथील चित्पावन ब्राह्मण समाज इतर ब्राह्मण समाजापासून थोडा अलग पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.आपल्या अथक परिश्रमाने आणि काटकसरी रहाणीमुळे हि सारी चित्पावन कुटुंबे आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत होती. ताम्हणकर वैद्य,कोल्हटकर ,जोशीराव ,गोखले,रानडे,फडके अशा समाजातील धुरिणांनी त्यावेळी वारंवार बैठक घेऊन भावी पिढीसाठी चित्पावन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आपली एक ज्ञाती संस्था स्थापन करण्याची गरज अधोरेखित केली.परिणामी 4 जून 1964 रोज कोल्हापूर आणि परिसरातील सर्व चित्पावन ब्राह्मणांच्या उन्नतीच्या हेतूने कोल्हापूर चित्पावन संघाची स्थापना झाली आणि त्याची रीतसर नोंदणी करण्यात आली.
स्थापनेपासून सुमारे 15 वर्ष संघाचे काम साधारण स्वरूपाचे म्हणावे असेच चालू राहिले. 1980 साली कोल्हापुरातील श्री जोशीराव सोशल वेलफेयर डिपार्टमेंट मधून निवृत्त होऊन कोल्हापुरी आले. त्यांच्याकडे श्री नंदकुमार मराठे आणि श्री कानिटकर नियमित येत असत. विविध सामाजिक उपक्रमांसंबंधी त्यांच्या चर्चा होत. त्याचवेळी कोल्हापूर चित्पावन संघाला शासनाकडून दीर्घकाळ कोणतेही सामाजिक कार्य चालू नसल्या कारणाने संस्था बंद करावी अशी नोटीस प्राप्त झाली.त्यामुळे संघाशी संबंधित सर्व संस्था व्यक्तींची एकत्रित सभा घेऊन ताबडतोब छोट्या प्रमाणात काही उपक्रम सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले, नवे व्यवस्थापकीय मंडळ स्थापन करण्यात आले आणि शासनाला तसे कळविण्यात आले. श्री प्रसन्न घाणेकर हे या काळात संघाचे कार्यवाह होते.
प्रथम संघास आर्थिकदृष्ट्या स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी परशुराम भिश्याची स्थापना करण्यात आली. यातूनच पुढे पतसंस्था स्थापन करण्याचा हेतू होता.कारण अशा संस्थेच्या माध्यमातूनच अधिकाधिक चित्पावनांचे संघटन करणे शक्य होणार होते.
आद्य संस्थापक कोल्हटकर यासुमारास अंथरुणाला खिळून होते.त्यांनी नंदकुमार मराठे यांचेकडून संघाची स्वमालकीची इमारत करण्यासंबंधी वाचन घेतले.कोल्हटकर काकांच्या इच्छेनुसार नंदकुमार मराठेंनी रु 1000 देणगी देऊन या उपक्रमाची सुरवात केली.श्री चितळेंनी आपली रु. 5000 ची देणगी जाहीर केली. मदतीचा ओघ सुरु झाला आणि अल्पावधीत संघाची सध्याची इमारत खरेदी करण्यात येऊन प.पु. शंकराचार्य करवीर यांचे हस्ते तुळजाभवानी संकुलाचे उदघाटन झाले. याच कार्यक्रमात श्री भाऊकाका गोखले आणि पं. वसंत गाडगीळ यांनी या वास्तूसमोरील रिकामी वास्तूदेखील खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. दोन दिवसात त्याही निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आणि महालक्ष्मी मंदिरानजीकची संघाची प्रशस्त वस्तू उभी राहिली.